पॅकेजसाठी व्यावसायिकांचे पालकमंत्री जयंत पाटलांना साकडे
इस्लामपूर(प्रतिनिधी) : लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स व्यावसायिक पुरते अडचणीत आले आहेत. प्रचंड गुंतवणूक, कामगारांना दिलेल्या आगाऊ रक्कमा, परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर, औद्योगिक व्यवसाय म्हणून हॉटेलचा समावेश असल्याने ज्यादा करांची आकारणी, वीजबिल, पाणीपट्टी, इमारतीचा वाढता खर्च, मालमत्ता कर, कर्जाची परत फेड करताना येणाऱ्या अडचणी यामुळे हॉटेलचे “मॅनेजमेंट” पुरते कोसळले आहे. लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे.
या आर्थिक वर्षात हॉटेल व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी व अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या पॅकेजची आवश्यकता आहे. यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना वाळवा तालुका हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी साकडे घातले आहे.
सोमवारपासून (ता.८ ) हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास केंद्र सरकारने मुभा दिली आहे; पण राज्य शासनाने त्याबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा जयंत पाटील यांच्या समोर व्यक्त केली आहे. नव्या आदेशाची हॉटेल व्यावसायिकांना प्रतीक्षा लागली आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील हॉटेल, उपाहारगृहांमधील पार्सल सुविधा सुरू आहे. पण ती मर्यादित आहे. पार्सल सुविधा देणे ही सुद्धा तारेवरची कसरत आहे. इस्लामपूर शहरात ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. २४ मार्चपासून इस्लामपुरातील हॉटेल, नाष्टा सेंटर, रेस्टॉरंट, आदी बंद करण्यात आले. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात जेवण, नाष्टा यांची पार्सल आणि होम डिलिव्हरीची सुविधा सुरू झाली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ही सेवा सुरू होती. अन्य व्यापार, व्यवसायांप्रमाणे हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी या व्यावसायिकांकडून राज्यात सर्वत्र होऊ लागली होती. या मागणीला केंद्र सरकारकडून अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सशर्त परवानगी मिळाली आहे.पण राज्य सरकार याबाबत उदासीन आहे.
“हॉटेल व्यवसाय सुरू झाल्यानंतर अर्थचक्राची गती वाढण्यास मदत होईल. ई-सिस्टीम राबवून, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केल्याने पार्सल सुविधा सेवा सुरळीतपणे पार पडली. यापुढेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यवसाय करण्यात येईल. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच इतर उद्योगाना जसे केंद्र सरकार पॅकेज देते असे आम्हाला द्यावे.
-अरुण कांबळे (अध्यक्ष, वाळवा तालुका हॉटेल असोसिएशन इस्लामपूर)
लॉकडाऊनच्या सुरुवातीला शहरात मोजक्याच हॉटेलमध्ये पार्सल सुविधा सुरू होती. सध्या सुमारे ८५ हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे आहेत. काही ठिकाणी पार्सल सुविधा सुरू आहे, उर्वरित रेस्टॉरंट, हॉटेलमधील सेवा बंद आहे. केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास मुभा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याची तयारी हॉटेल व्यावसायिकांकडून सुरू आहे. त्यात गावी गेलेल्या कामगारांना बोलाविणे, साफसफाई करणे, पावसाळ्यातील नियोजन म्हणून धान्यखरेदी, इमारतीची डागडुजी, आदींचा समावेश आहे.
कामगारांबरोबर अनेक मालकही झाले बेरोजगार..!
अनेक युवकांनी नव्याने हॉटेल व्यवसायात प्रवेश केला होता. लॉकडाऊनमुळे कामगारांबरोबर अनेक मालकही यानिमित्ताने बेरोजगार झाले आहेत. यासाठी हॉटेल व्यवसाय लवकर सुरू होणे आवश्यक आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून व्यवसाय करू अशी हॉटेल व्यावसायिकांची भावना आहे. मंत्री जयंत पाटील याप्रश्नी लक्ष घालू असे आश्वासन हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.