नवी दिल्ली – देशाच्या दक्षिण भागातील काही विविध राज्यांमध्ये काही व्यक्ती इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील झाले असल्याची माहिती केंद्रीय आणि राज्याच्या सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने तेलंगणा, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये इस्लामिक स्टेटचे अस्तित्व असल्याप्रकरणी, 12 खटले दाखल केले असून या संदर्भात आतापर्यंत 122 जणांना अटक केली आहे.
इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेवंट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया, दाईश, इस्लामिक स्टेट इन खोरासन प्रांत, विलायत खोरासन. इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम-खोरासन आणि तिथल्या सर्व कार्यरत संघटनांना दहशतवादी संघटना म्हणण्यात आले आहे.
तसेच या सर्व संस्थांचा समावेश, केंद्र सरकारने अवैध कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंदी घातलेल्या संघटनांमध्ये करण्यात आला आहे. आपल्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी इस्लामिक स्टेट सोशल मीडियाचा वापर करत असते.
या संदर्भात, सायबर स्पेसकडे सर्व सुरक्षा यंत्रणांचे बारीक लक्ष असून कायद्याप्रमाणे आवश्यक ती कारवाई देखील करण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, ‘आयएस’ ही संघटना केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि जम्मू कश्मीर या राज्यांमध्ये अधिक सक्रीय आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.