कोलंबो – रविवारी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशातवादी संघटनेने स्वीकारली आहे. इसिसने “अमाक’ या न्यूज एजन्सीच्या माध्यमातून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही जबाबदारी स्वीकारली आहे. जिहादी कारवायांवर देखरेख करणऱ्या साईट इंटेलिजन्स ग्रुपने ही माहिती दिली आहे.
या बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 321 झाली असून तब्बल 500 जण ज्खमी झाले आहेत. आतापर्यंत 40 संशयितांना अटक करण्यात आली आहे. आत्मघातकी हल्लेखोर ज्या व्हॅनमधून आले होते, त्या व्हॅनच्या चालकालाही अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यासंदर्भात “नॅशनल त्वाहीद जमाथ’ या कट्टरवादी गटावर संशय व्यक्त करण्यात येत होता. रविवारचे सर्व बॉम्बस्फोट हे आत्मघातकी स्फोट घडवून आणले होते. हे सर्व हल्लेखोर श्रीलंकेचेच नागरिक होते, असे सरकारी प्रवक्ते रजिथा सेनेराथ यांनी सांगितले.
श्रीलंकेच्या पोलिसांनी गेल्या 24 तासांमध्ये आणखी 16 जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या 40 झाल्याचे रुगान गुणसेकर यांनी सांगितले. या 40 जणांमध्ये 26 जणांना सीआयडीने तर तिघांना दहशतवाद तपास विभागाने अटक केली आहे. 9 जणांना यापूर्वीच पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेजण दक्षिण कोलोंबोतील पोलिसांच्या ताब्यात आहेत, असेही गुनसेकर म्हणाले.