नवी दिल्ली : राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? असे खळबळजनक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. दरम्यान नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “राहुल गांधी जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. तिथे ते गेले अन् बॉम्बस्फोट झाला. ते तिथून गेले होते म्हणून बरं झालं. राहुल गांधी जिथे थांबले होते तिथून ५०० मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. नोटाबंदी झाल्यावर दहशतवाद संपेल असं यांनी सांगितलं होतं. पण मग दहशतवाद संपला का? दहशतवादी राहुल गांधी होते तिथपर्यंत कसे काय येऊ शकले?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली.
“जे राहुल गांधी आज देशाच्या जनतेचा आवाज होऊन देशासाठी काम करत आहेत त्यांना संपवण्याचा हा कट तर नाही ना असा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो,” असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील खीर भवानी मंदिराला तसेच हजरतबाल या मुस्लिमांच्या धार्मिक स्थळास भेट दिली. गांधी यांचे दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर भेटीसाठी सोमवारी आगमन झाले. नंतर ते सकाळी चिनार वृक्षांच्या रम्य परिसरात असलेल्या खीर भवानी मंदिरात गेले. तुल्लामुल्ला भागात मध्य काश्मीर जिल्ह्य़ात हे मंदिर आहे.
गांधी यांच्या समवेत पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल व अ.भा. काँग्रेस समितीच्या जम्मू-काश्मीरमधील प्रभारी रजनी पाटील होत्या. गांधी यांनी अर्धा तास मंदिरात व्यतीत करून प्रार्थना केली. मंदिरातून निघाल्यानंतर त्यांनी मीर बाबा हैदर यांच्या धार्मिक स्थळास भेट दिली. गांधी यांनी दाल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या हजरतबाल दग्र्यासही भेट दिली.
जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या मुलाच्या विवाहास काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. दरम्यान एम ए रोड येथे त्यांच्या हस्ते काँग्रेस भवनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्ते व नेते यांच्याशी संवाद साधला.