पुणे – कोथरूड, कर्वेनगर, पौड व कर्वे रस्ता यांसह संपूर्ण कोथरूडमध्ये वाहतूक नियमांतून सुट देण्यात आली आहे का, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
पौड फाटा ते चांदणी चौक आणि पौड फाटा ते वारजे क्षेत्रिय कार्यालय या व्ही पट्ट्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचंड रहदारी असते. त्यात पौड फाटा, करिश्मा चौक, मृत्यूंजयेश्वर मंदिर व कर्वे पुतळा चौक या ठिकाणी तसेच आयडीयल कॉलनी, आनंदनगर, गुजराथ कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड बस स्टॅण्ड या महत्वाच्या चौकांत पाहणी केली तर वाहतूक नियमांचे पालन केले जात नसल्याचे जवळपास रोज दिसून येते.
डोक्यावरील केसांना ऑक्साइड रंग लावून तोंडात तोबरा भरून गाड्यांवर अप्पा, तात्या, दादा असल्या राजकीय सेवेच्या पाट्या लावून या नियमांचे सर्रास उल्लंघन होते. या प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस उभे असतात मात्र, कारवाई करण्याएवजी कडेला थांबून पावत्या फाडण्याचे सक्षम कार्य करताना दिसतात.
वाहन चालवताना मोबाइलवर बोलणारे सोकॉल्ड भाई देखील आहेतच. कॅब चालक, रिक्षा चालक, दुचाकीस्वार यांच्यासह सुशिक्षित कारचालकही अत्यावश्यक फोन वाहन चालवताना घेतात हे चित्र तर सातत्याने दिसते. वाटेत कोणी अडवा आला तर त्याच्यावरच दादागिरी करण्यात अनेकजण धन्यता मानतानाही दिसून येतात. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे का असा प्रश्न निर्माण होतो.
या भागात अनेकदा चेन स्नॅचिंगसारखे गुन्हेही घडतात. आता तर काय मास्कचा वापर करण्याचे बंधन, दुचाकीचा अर्धवट दिसणारा क्रमांक यांमुळे असा गुन्ह्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेणार का कारवाई करणार हा सध्या सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.