शिवसेनेची एअर इंडियावरून सरकारवर टीका
मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेकडून भाजप आणि केंद्र सरकारवर रोज नवनवीन मुद्यावर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेनेने केंद्र सरकारने विक्रीस काढलेल्या एअर इंडिया कंपनीवरून जोरदार टीका करण्यात आली आहे. एकीकडे 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे वादे करायचे आणि दुसरीकडे कर्जबाजारी सरकारी कंपन्या विकून दात कोरून पोट भरण्याचे उद्योग करायचे, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेने टीका करत असताना, सुमारे 80 हजार कोटींच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेली प्रमुख सरकारी विमान कंपनी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांच्या संपूर्ण खासगीकरणाची नवी योजना केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केली. यावरून शिवसेनेनं सरकारवर निशाणा साधला आहे.
एअर इंडियामध्ये काम करणारे हजारो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भवितव्याचा प्रश्न शेवटी सर्वात महत्त्वाचा आहे. जेट एअरवेजसारख्या मोठ्या कंपनीचे गेल्या वर्षी जे झाले ते एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांबाबत घडू नये. एअर इंडियावर सध्या 80 हजार कोटी एवढया कर्जाचा बोजा आहे. त्यात गेल्या वर्षी सुमारे साडेआठ हजार कोटींच्या तोटयाची भर पडली आहे. त्यामुळे एअर इंडिया हे सरकारसाठी जड झालेले ओझे ठरलेले आहे का? त्यामुळेच सरकारने एअर इंडियाच्या संपूर्ण खासगीकरणाचा मध्यम मार्ग काढला असावा, असं म्हणत शिवसेनेनं सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर टीका केली आहे.