शासनाची समिती गावागावांत जाऊन माहिती करणार संकलित
– प्रमोल कुसेकर
मांडवगण फराटा – ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता निर्माण व्हावी, या उद्देशाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानाची 2 ऑक्टोबर 2014ला सुरवात झाली. 18 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्र (ग्रामीण) हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला ; परंतु हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीमध्ये शौचालयाचा वापर होतो की नाही, याची माहिती आता संकलित केली जाणार आहे. त्यातून खरंच गाव हागणदारीमुक्त झाले की नाही, हे समोर येणार आहे.
हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता सुविधांचा प्रत्येकाने वापर करणे गरजेचे आहे. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणांची (बाजारपेठ), यात्रास्थळ, वर्दळीचे (ठिकाण) पडताळणी केली जाणार आहे. ही पडताळणी करण्यासाठी समिती गठीत केली असून, त्यामध्ये केंद्रप्रमुख, अंगणवाडी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, पाणी पुरवठा समितीचे सदस्य, महिला बचत गटाची सदस्या यापैकी सहा सदस्यांची समिती प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. पायाभूत सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असणारे, त्यातून सुटलेले व त्यानंतर सर्व कुटुंबाच्या घरी प्रत्यक्ष घरी भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे. कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या, शौचालयाची उपलब्धता, वापर, शौचालयाचा प्रकार, मैला व्यवस्थापनासाठी शोषखड्डा, घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. सार्वजनिक शौचालयामध्ये महिला व पुरुषांकरिता किती सीट्स उपलब्ध आहेत, याची पाहणी करणार आहेत.
मोबाईल ऍपमध्ये नोंदणी होणार
हागणदारीमुक्त गावांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उपलब्ध माहिती मोबाईल ऍपमध्ये नोंदवली जाणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून मोबाईल ऍप तयार केले जाणार असून, हा ऍप वेळेत तयार न झाल्यास प्रपत्रात भरून त्यानंतर मसहिती मोबाईल ऍपमध्ये भरावी लागणार आहे.
जुन्या बेसलाइनच्या सर्वेनुसार 8 मार्च 2017ला शिरूर तालुका 100 टक्के हागणदारीमुक्त झालेला आहे; परंतु एलओबीनुसार आता नव्याने स्थलांतरीत व विभक्त झालेल्या कुटुंबाना हागणदारीमुक्त करण्याचे काम सुरु आहे.
– संदीप जठार, गटविकास अधिकारी शिरुर.