मुंबई: मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक लोकलदेखील थांबल्या आहेत.ग्रीड फेल झाल्यानं बत्ती गुल झाल्याची माहिती मिळत आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास किमान एक तासाचा अवधी लागू शकतो.
मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. आशिष शेलार वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, ‘मुंबईत अचानक वीज पुरवठा का जातो. या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कुठे आहे वीज मंत्री? मुख्यमंत्री आता जनतेशी का बोलत नाहीत?, असे सवाल करतानाच मुंबईकरांवर बेततं तेव्हा गायब होणारी ही मंडळी आहेत, अशी टीका शेलार यांनी केली.
ते पुढे म्हणाले, ‘केवळ नियोजन शून्यतेमुळे विद्यार्थी आणि रुग्णांची दुरावस्था होत आहे. चाकरमानी लोकलमध्ये अडकले आहेत. हा केवळ नियोजन शून्यतेचा परिणाम आहे. या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या तात्काळ निलंबित करा.’ अशी मागणी त्यांनी केली.