नवी दिल्ली – ‘देशाची घसरलेली आर्थिकस्थिती पाहता मला समजत नाहीये की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होतोय की विनाश?’, असा परखड सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
जीडीपी अगोदरच घसरला असून बेरोजगारीही ज्वलंत समस्या असताना आता भाववाढ गगनाला भिडल्याने त्याचा चटका सर्वसामान्यांना सोसावा लागतोय. बॅंक धोक्यात असून लोकांचा पैसा बॅंकेत अडकून पडला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी सामाजिक परिस्थितीवरून देखील सरकारला फैलावर घेतले. सामाजिक न्यायाला सरकार पायदळी तुडवत असल्याने लोकांचा सरकारवरील विश्वास कमी झाला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
याबाबत राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, बॅंक धोक्यात आहे आणि जीडीपीसुद्धा! महागाई याअगोदर ऐवढी कधीही नव्हती, नाही बेरोजगारी! जनतेचे मनोबल खचत चालले आहे. सामाजिक न्यायाला दररोज पायदळी तुडवले जात आहे. विकास की विनाश!