नवी दिल्ली – गेल्या काही काळापासून सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री कंगना रणावतला मनकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी आणि पंगा या चित्रपटांतील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून कालपासून या विषयावर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी तर हा राष्ट्रीय पुरस्कार आहे की राष्ट्रवादी पुरस्कार अशा खोचक शब्दांत टीप्पणी केली आहे.
हा राष्ट्रीय पुरस्कार आता एक विनोदाचा विषय झाला असल्याचे प्रतिक्रिया एका यूजरने व्यक्त केली आहे, तर जयललिता यांच्या जिवनावर आधारित चित्रपटासाठी कंगनाला ऍडव्हान्समध्येच हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे अन्य व्यक्तीने म्हटले आहे. हा नवा भारत आहे. येथे विदूषक मंडळींना पुरस्कार मिळत असून विदूषक मंडळींचा समूहच पुरस्कार कोणाला द्यायचा याची निवड करत असल्याचे नमूद करत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे नामकरण आता भाजप चित्रपट पुरस्कार ठेवले गेले पाहिजे असेही मत काहींनी नोंदवले आहे.
दरम्यान, कंगनावर केवळ टीका झाली नाही, तर तिच्या समर्थनार्थ काही लोक मैदानात उरतले आहेत. जर हे राष्ट्रवादी पुरस्कार असतील तर त्यात गैर काय आहे, असा सवाल एकाने सिंघवी यांना विचारला आहे. एका परिवारवादापेक्षा राष्ट्रवाद केव्हाही चांगला असेही त्यांनी नमूद केले आहे. तर क्रूर जहांगिरला लव्हर बॉय दाखवले जात होते. ते योग्य होते का, असाही प्रश्न एकाने विचारला आहे.