हल्ली जरा सुट्टी मिळाली की लोक विकेन्ड साजरा करायला कुटुंबाला घेऊन निघतात. जाण्यायेण्यात सात-आठ तास (ट्रॅफिक नसेल तर), तिथे जाऊन गर्दीत मिसळून थातुरमातुर साइट सिईंग करायचं किंवा रिसॉर्टच्या रूममध्ये टीव्ही पाहात झोपून राहायचं.सुट्टी संपवून दमून यायचं आणि दुसऱ्या दिवशी कामाला जुंपायचं! आपण नक्की का जातो वीकएंडला? कशापासून लांब पळतो? मला वाटतं रोजची चाकोरी मोडणे हा त्यामागील महत्त्वाचा हेतू असतो. चाकोरी म्हणजे काय? नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा आणि बायकोचे घरकाम? चाकोरी म्हणजे रोजची मेल्स, व्हॉट्सऍप, फेसबुक, टीव्ही, गर्दी, ट्रॅफिक? मग हे मोडायला, ह्यापासून आराम मिळवायला परत त्यातच का जायचं?
सुट्टीच्या दिवशी घरातलं वायफाय आणि टीव्ही बंद करून टाकावे. फोन स्वीचऑफ करून कपाटात ठेवावा. खूप गप्पा माराव्या. मुलांशी खेळावे, ज्येष्ठांना वेळ द्यावा, बाहेरून ब्रेकफास्टसह सर्व जेवण मागवू शकता. सर्वांना मान्य असेल तर जवळचे भावंड किंवा जिवलग मित्रांना सहकुटुंब घरी बोलवावे. गप्पांचे फड जमवावे, पत्ते खेळावे, गाणी ऐकावी, वाद्यावरची धूळ झटकून त्यावर एखादा साज छेडावा, छान पुस्तक वाचावे. बायकोला सकाळी सायंकाळी चहा करून द्यावा.
नको ती गर्दी, नको ते ट्रॅफिक, नको ते ड्रायव्हिंग! विकेन्ड कधी एन्ड होईल ते कळणारसुद्धा नाही. एन्ड न होणाऱ्या अनेक आठवणी देत!
अनावश्यक प्रवास तसेच प्रदूषण टाळा. आनंद मिळवण्यासाठी लांबचा प्रवास किंवा पैसे खर्च केलेच पाहिजेत असे नाही. सध्याची तर महामारीची विषाणूजन्य परिस्थिती. अनेक घरात आर्थिक विवंचना असलेली कुटुंबे बघायला मिळतात, अशा वेळेस हा फंडा निरुपयोगीच ठरावा. विरंगुळा… कामात बदल म्हणताना इतरही काही आवडी जपण्यास मुलांना उदयुक्त करता येतेच. सवयी आपण लावण्यावरच हे गृहीतक. मग हे माझे मत सगळ्यांना पटेल असे नाहीच… आपणच पुढील पिढीला चुकीच्या सवयी लावत आहोत असं तर नाही ना?
आता सध्या तर मुले सतत ऑनलाइन असतात… मग यामध्ये थोडा बदल म्हणून हे अपेक्षितच… पण भविष्यात सगळ्या बदलांची मानसिकता मुलांमध्ये निर्माण होणे गरजेचे. मानसिक, आर्थिक आणि शारिरीकदृष्ट्याही गरजेचे. परिस्थिती सतत बदलांची असते हा विचार देणेही गरजेचे. अनुकरण आणि अनुसरण करणं हा स्थायीभाव असतो. न्यूनगंड-अहंगड जोपासले, बळावले जाण्याची दाट शक्यता असते. अर्थात प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असली तरी मूळ मानसिकता गरीब श्रीमंत भेद बघत नाही मग यातून येते वर्तनसमस्या. ईर्षा, मत्सर आणि बरेच काही. असा बराच विचार नकारात्मक वाटला तरी सकारात्मकतेकडेच घेऊन जाणाराच आहे. भावी काळाला सामोरे जाण्याची ही पूर्वबैठक ठरते. तेव्हा समतोल साधायलाही शिकवायला हवंच.
मधुरा धायगुडे