दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबद्दल ट्विट केले आहे. आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? महारष्ट्र आणि पश्चिमबंगालच्या चित्ररथ दिसू नये यामागे राजकीय षडयंत्र तर नाही ? असे त्यांनी ट्विट केले आहे.
महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसु नयेत या मागे राजकिय षडयंत्र आहे काय?
आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?— Sanjay Raut (@rautsanjay61) January 2, 2020
तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकार विरोधकांवर आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचे ट्विट केले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली.हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020
यंदा प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) राजधानी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या दिमाखदार संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. २६ जानेवारी निमित्त राजपथावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात प्रत्येक राज्यातून चित्ररथ सादर केले जातात.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्राने यावर्षीच्या संचलनासाठी ‘मराठी रंगभूमीची १७५ वर्षे’ या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो नाकारला गेला आहे.