एक मुलगी खरंच किती स्वप्न बघत मोठी होत असते. कोवळी कळी असते. आईबाबांची राजकन्या असते. शाळेतील स्कॉलर असते. बहिणींचा जीव असते. भावाची पाठराखीण असते. ती स्वत:च्याच विश्वात रममाण असते. तिला जगाचं काहीच घेणं देणं नसतं. मात्र इथेच ती चुकते. कारण तिला माहितीच नसते की जगातील पशू तिच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून आहेत. अशाच एका बेसावध क्षणी ते नराधम तिचा बळी घेतात. तिला कसलीही पुर्वकल्पना नसताना. मात्र आपला समाज तिने किती छोटे कपडे घातले होते, हे अगदी न विसरता सांगत असतो. ती संकटात असताना तिला वाचवायला तर पुढे सरसावत नाहीत; पण तीच कशी चुकीची होती, हे सांगण्यासाठी मात्र अगदी पहिल्या नंबरवर असतात.
दोन महिन्यापासून तर पाच वर्षांपर्यंतच्या मुलींना तर हेच माहिती नसते की त्या स्त्री आहे का पुरुष? तर त्यांच्या पुढील आव्हाने काय आहेत? याची साधी पुसटशी जाणीव देखील ज्यांना नसते, अशा कोवळ्या जीवांचा घोट घेताना खरंच त्या समाजात वावरणाऱ्या पशूंचे काळीज गळून पडत नसेल का? मुलगी होणे एवढे वाईट आहे काय? अशा किती तरी प्रश्नांना उत्तर शोधण्याची हीच ती योग्य वेळ आहे.
अन्यथा पुरूषांना जन्म द्यायला एक आई नकार देईल तो दिवस दूर नाही, असे सध्या समाजातील विविध घटनांचा विचार केला असताना नक्कीच जाणवते? खरंच आपण अतिशय असुरक्षित वातावरणात राहतो काय? आपल्याला सुरक्षित वातावरण कुठेच मिळू शकणार नाही काय? अशा अनेक प्रश्नांनी मुलींच्या मनात घर केले आहे. यामुळे सामजिक वातावरण बदलण्याची हीच ती योग्य वेळ आहे, अन्यथा उशीर झाल्याशिवाय राहणार नाही…
– वंदना चंद्रशेखर