मुंबई – दुखापतीतून सावरल्यावर मैदानात उतरलेल्या रोहित शर्माला आता घरचा आहेर मिळत आहे. मुंबईच्या या स्टार फलंदाजावर माजी कर्णधार दीलीप वेंगसरकर यांनीच ताशेरे ओढले आहेत. देशाकडून खेळण्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे का, त्यापेक्षा आयपीएल खेळणे महत्त्वाचे आहे, अशा शब्दात वेंगसरकर यांनी विचारणा केली आहे.
रोहित जर दुखापतीने जायबंदी झाला होता व भारतीय संघाच्या फिजिओंनी त्याच्याबाबतचा अहवाल निवड समितीला दिलेला आहे. आता जर खुद्द रोहितच पूर्ण तंदुरुस्त असल्याचे सांगत असेल तर त्यावर निवड समिती काय भूमिका घेणार, पण पूर्ण तंदुरुस्त नसतानाही जर रोहित केवळ दिखाव्यासाठी मैदानात उतरला असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
रोहित जायबंदी झाल्यामुळेच त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. मग अचानक तो पूर्ण तंदुरुस्त कसा होतो. तसेच आपली तंदुरुस्ती बीसीसीआयला कळवण्याचे सौजन्यही तो दाखवत नाही. जर तो तंदुरुस्त आहे किंवा झाला आहे तर त्याची माहिती संघाच्या फिजिओला कशी मिळाली नाही, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
केवळ आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा त्याचा हा हट्ट आहे, असेच वाटत आहे. त्यामुळे देशाच्या संघाकडून पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर खेळणे महत्त्वाचे आहे, का आयपीएलमध्ये खेळणे महत्त्वाचे आहे, असे त्याला विचारावेसे वाटते. जर रोहितची दुखापत फारशी गंभीर नव्हती तर मग मयंक आग्रवालप्रमाणे निवड समितीने दुखापत झालेली असतानाही त्याची निवड का केली नाही. फिजिओने दिलेला अहवाल तरी योग्य होता का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
अमिरातीततील आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या मालिकेची सुरुवात 27 नोव्हेंबरला होत असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय, तीन टी-20 व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ याच महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.