मुंबई – औरंगाबादचे नामांतर करण्यावरून महाविकास आघाडीमधील नेते आमनेसामने आले आहेत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही असून कॉग्रेस मात्र विरोधात आहे. अशातच औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा खरमरीत सवाल शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेस नेत्यांना विचारला आहे.
अरविंद सावंत म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे घोषित केले आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. करोनामुळे राहिलेले हे काम आता होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, औरंगाबादचे नाव बदलण्यास विरोध असल्याचे विधान कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आणि ते प्रथमच वादात सापडले.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. “औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे,’ अशी मागणी भाजपने उचलून धरली आहे.