केंदूर -चासकमान धरणाचे पाणी कोरेगाव-धानोरे (ता. शिरूर) चारीला सोडण्यात यावे यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्यास अखेर गुरुवारी (दि. 21) यश आले आहे. या चारीला सकाळी 10 वाजता पाणी सोडण्यात आले. दरम्यान, 20 महिलांसह 65 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर शेतकरी आणखी संतप्त झाले होते. त्यांनी न्यायालयीन लढ्याचा इशारा दिल्यानंतर पाटबंधारे खात्याचे धाबे दणाणले अन् त्यांनी दिलेल्या दुसऱ्या आश्वासनाप्रमाणे गुरुवारी पाणी सोडले. जर शेतकऱ्यांनी लढा थांबविला असता तर हक्काचे पाणी यंदा मिळालेच नसते. तरी “देर आये दुरुस्त आये’ म्हणत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे आभार मानत 65 शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे.
पाणी मिळत नसल्याने जातेगाव खुर्द, पिंपळे जगताप शिक्रापूरच्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन बुधवारी (दि. 6) चक्रीउपोषण सुरू केले होते. गुरुवारी (दि. 7) हे उपोषण मोडीत काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 10) पाणी देऊ असे लिखित स्वरूपाते खोटे आश्वासन देऊन उपोषण गुंडाळले होते. त्यानंतर सांगितलेल्या दिवशी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि चारीचे स्वतः दरवाजे उघडून पाणी सुरू केले होते. त्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार, उपनिरीक्षक राजेश माळी, किरण भालेकर, प्रवीण साळुंखे त्याचबरोबर ब्रह्मा पोवार यांनी पाटबंधारेच्या अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणत या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
गुरुवारी (दि. 21) पाणी देण्याचे अधिकाऱ्यांकडून आश्वासन घेऊन शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची जबाबदारी स्वीकारली, त्यानंतर शेतकाऱ्यांनी गुरुवारपर्यंत पाण्याची वाट पाहण्याची तयारी दर्शवली. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 20 महिलांसह 65 शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी न्यायालयीन लढ्याचे अस्त्र उगारले. त्यामुळे पाटबंधारे खाते झुकले अन् त्यांनी गुरुवारी पाणी सोडले. या चारीला पाणी आल्याने जातेगाव, शिक्रापूर, पिंपळे जगताप, करंदी परिसरातील शेतकऱ्यांची शेताला पाणी देण्यासाठी आता लगबग सुरू आहे.
शिक्रापूरच्या शेतकऱ्यांना आता जाग आली?
शिक्रापूर – करंदी येथे शेतकऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी उपोषण आणि आंदोलन केले त्यावेळी शिक्रापूर भागातील शेतकरी आंदोलकांच्या सोबत नव्हते, त्यानंतर प्रशासनाच्या वतीने पाण्यासाठी तारीख देऊनदेखील पाणी सोडले नाही. त्यानंतर शेतकरी एकत्र आल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तोपर्यंत शिक्रापूरचे शेतकरी कोठेही सहभागी नव्हते. मात्र, गुरुवारी पाणी सोडणार असताना शिक्रापूरचे शेतकरी चासकमान कालव्यावर येत पूजन करतात मग आंदोलनादरम्यान शिक्रापूरचे शेतकरी कोठे होते? आता जाग आली का, असा देखील सवाल करंदी येथील आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
तब्बल 60 दिवसांनी चारीला पाणी…
या भागातील शेतकऱ्यांना तब्बल 60 दिवसांनी पाणी मिळाल्याने आनंद होतोय; मात्र येथील शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी सोन्यासारख्या जमिनी दिल्या तरीदेखील हक्काच्या पाण्यासाठी उपोषण, आंदोलन करावे लागते. अधिकारी राजकीय दबावाला बळी पडतात आणि हक्काच्या पाण्यासाठी लढावे लागत ही दुर्दैवी बाब असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
या आंदोलनाला जरी यश आले असले तरी पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू केला आहे, त्यासाठी ऍड. दिग्विजय पलांडे हे न्यायालयात या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळेपर्यंत बाजू मांडणार आहेत.
– समाधान डोके, मुख्य आंदोलक शेतकरी