मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. इरफान खानची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
— Irrfan (@irrfank) March 16, 2018
दरम्यान काही दिवसांपूर्वी इरफान खान यांनी ट्वीट केलं होतं की, “जीवनात आलेले अनपेक्षित बदल तुम्हाला पुढे जायला शिकवतात. गेल्या काही दिवसांत माझ्याबाबतीत हेच घडलं आहे. मला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाला आहे आणि हे स्वीकारणं फार कठीण आहे. पण माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत, त्यांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मला शक्ती मिळाली आहे. त्यामुळे मला आशेचा किरण दिसतो आहे. सध्या, या आजाराच्या उपचारासाठी मला दुसऱ्या देशात जाऊन उपचार करावे लागणार आहेत. पण, माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचे संदेश मला पाठवत राहा.”
आपल्या या आजाराबद्दल इरफान पुढे सांगितलं होतं की, “आजाराच्या नावात न्यूरो ऐकून लोकांना वाटतंय की हा आजार डोक्याशी संबंधित आहे. पण, असं नाही. या आजाराबद्दल अधिक माहिती तुम्हाला गूगलवर नक्की मिळेल. ज्यांनी या आजाराबद्दल माझ्याकडून जाणून घेण्यासाठी वाट पाहिली त्यांच्यासाठी अनेक वेगळ्या कथा घेऊन मी परतणार आहे.” एनएचएस डॉट युके यांच्याकडील माहितीनुसार, न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर हा एक दुर्मीळ प्रकारचा ट्यूमर असून तो शरीराच्या विविध भागात निर्माण होऊ शकतो.
दरम्यान जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘पिकू’चे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी ट्विटरद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली.