नवी दिल्ली, दि. 26 – मास्कचा वापर न कररणाऱ्या तसेच सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत नसलेल्या बेजबाबदार नागरिकांमुळेच करोनाचा प्रसार भारतात वेगाने झाले, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी व्यक्त केले आहे.
मार्च महिन्यापासून देशात करोनाचा धोका वाढला. त्याचबरोबर देशात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, एप्रिल महिन्यापासून अनलॉकची प्रक्रीयाही सुरु करण्यात आली. यावेळी करोनाचा भारतात इतका प्रसार होणार नाही असा विश्वास होता. मात्र, मास्कचा वापर किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसलेल्या अत्यंत बेजबाबदार नागरिकांमुळेच करोनाचा प्रसार वेगाने झाला. नागरिकांना याचा धोका व त्याचे गांभीर्य ओळखताच आले नाही, असेही त्यांनी सांगितले.
देशात करोनातून बरे होत असलेल्यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी त्याची बाधा होण्याचे प्रमाण घटलेले नाही. त्यात घट झाली तरच नवे रुग्ण आढळणार नाहीत. मात्र, जेव्हा खरोखर सरकारच्या आदेशांचे पालन केल असते तर हा धोका निदान भारतात तरी नियंत्रणात राहिला असता.
सध्या काही शहरांत हा धोका कमी झाल्याचे दिसत असले तरीही येत्या किमान तीन महिन्यांत तरी करोनाबाबतच्या सरकारच्या आदेशांचे पालन केले गेले पाहिजे, अन्यथा हा धोका पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.