गोरखपुर – नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर आणि एनपीआरच्या संबंधात काही राजकीय पक्षांकडून लोकांमध्ये गैरसमज आणि भीती पसरवण्याचे बेजबाबदार वर्तन घडत आहे. या विषयावरून ते अफवाही पसरवत आहेत असा आरोप योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. आज देवरिया येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की देशातील धार्मिक सलोखा बिघडण्याचा त्यांचा हा प्रयत्न जबाबदारपणाचा नाही.
केवळ लोकांना भडकावण्यासाठीच या विषयाचा उपयोग करून घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांनी अशा प्रकारे लोकांमध्ये भीती व अफवा पसरवणे कोणत्याही अर्थाने समर्थनीय ठरत नाहीं. हा देश कोणा एका राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा नाहीं. हा देश मोदींचाहीं नाही आणि अमित शहांचाहीं नाही किंवा योगी अदित्यनाथ यांचाही नाही. सर्व भारतीयांचा हा देश आहे. त्यात धार्मिक सलोखा कायम राखण्याची गरज आहे. हिंदु-मुस्लिमांमधील बंधुभावाचे वातावरणही त्यांनी खराब करू नये असे आवाहनही त्यांनी संबंधीत राजकीय पक्षांना केले.
देशातील मुस्लिमांमध्ये यावरून जे भीतीचे वातावरण निर्माण होते आहे, ते दूर करण्याची गरज आहे. बहुतांशी मुस्लिम नागरीक देशभक्त आहेत असेही ते म्हणाले. देवरिया महोत्सवासाठी बाबा रामदेव येथे आले आहेत. यावेळी बोलताना बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या नमामी गंगा प्रकल्पाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. या प्रकल्पामुळे गंगेचे संपुर्ण शुद्धीकरण लवकरच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.