नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने 1 हजार 500 या टप्प्याकडे कूच करत आहे. लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांचे उल्लंघन करण्याच्या बेजबाबदारपणामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी अप्रत्यक्षपणे बेजबाबदारपणाविषयी खंत व्यक्त करण्यात आली. काही ठिकाणी जनतेच्या पाठिंब्याचा अभाव आणि संशयित रूग्णांबाबत वेळेत माहिती देण्यातील अपयश कोरोनाचा फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सूचित केले.
देशातील कोरोनाबाधितांचा विचार करता महाराष्ट्रातील संख्या सर्वांधिक आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 241 रूग्ण आढळले आहेत. उत्तरप्रदेश, तामीळनाडू या राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. तर, दिल्ली, कर्नाटक, राजस्थान या राज्यांमधील बाधितांची संख्या 100 जवळ जाऊन ठेपली आहे. गुजरात, तेलंगण, मध्यप्रदेश या राज्यांत करोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 70 च्या आसपास आहे.