स्वत:चे अंगण स्वकियांमुळेच रणांगण झाल्याने पार्टीतील एकमेव द्वितीय अर्जुन व्यथित झाले व नागपूरवरून रथाचा धुराळा उडवत मुंबईत डेरेदाखल झाले.
घोडे थकले असतील म्हणून थोडा विसावा घ्यावा, या विचाराने नागपुरी पार्थने आपले गांडीव धनुष्य रथावर ठेवले व घोड्यांना पाणी पाजू लागला. काही क्षणातच सुदर्शन चक्रधारी व सर्वांच्याच छावणीत वावर असलेले “कन्हैया’ अवतरले व पार्थकडे बघून स्मित करू लागले.
“मधुसुदना, आपण? आपण तर विरोधकांच्या छावणीत होतात?’
“पार्था, माझा वावर सगळीकडे आहे, मला कुठेही रोकटोक नाही.’
“ठाऊक आहे कृष्णा, आम्ही पण अनुभव घेतला आहे पहाटे पहाटे’.
“विसर ते पार्था, तो इतिहास झाला आता. हे नवीन काय आरंभले बरं? रणांगण, अंगण वगैरे वगैरे…!’
“गोपाळा, हातातून सत्ता निसटल्यापासून आमचे अंगण हे रणांगण झाले आहे. कुणाकुणाला शांत बसवावे आणि हे बिनविरोध आमदार प्रकरणानंतर तर वणवाच पेटला.’
“म्हणूनच हे रणांगण पेटवलेत होय पुन्हा, म्हणजे लक्ष विचलित व्हावे आणि नाराज आपल्याच सोबत आहेत की नाही याची पण चाचपणी केली. हा हा हा…!’
“कृष्णा, आपण अंतर्यामी आहात, सारे राजकारण ओळखता. आम्हाला पण या अडचणीच्या वेळी “राजोपदेश’ करा’.
“पार्था, युद्ध तुझे तुलाच लढायचे आहे, मी केवळ सारथी. कधी यांचा रथ तर कधी त्यांचा रथ हाकणे एवढेच माझे काम. बरं, या अंगण रणांगणमुळे काय मिळवले नेमके तुम्ही? चुकीच्या वेळी चुकीचा बाण चालवला असे नाही वाटतं? आणि मी पुन्हा येणार, असे वचन दिले ते असे येणार म्हणून होय?’ धनुर्धरा तुझा नेम चुकला बरं’.
“गोपाळा, आता काय? विजय कुणाचा होणार?
“पार्थ, मी जिथे, विजय तिथे. सध्या तरी मी पलीकडे आहे व तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा फॉर्म्युला या निमित्ताने आमच्या हाती लागला आहे. तेव्हा आगे आगे देखो होता है क्या? हा हा हा…!’
“धन्यवाद मधुसुदना, मला ज्ञान मिळाले’.
असे म्हणून पार्थ प्रणाम करतो. कृष्ण मिश्किल हास्य करीत, मनात विचार करतो की, मीच आहे खरोखर सत्ताचक्र फिरवणारा. (हातातील सुदर्शन चक्र गरगर फिरवत वर्षा बंगल्याकडे प्रयाण करतो.)
– धनंजय एकबोटे