श्रीनगर : जम्मु-काश्मीरमधील वाढत्या तणावपुर्ण परिस्थितीचा विचार करता आता देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचा मेंटोर आणि कोच इरफान पठाण याच्यासह सर्वच 100 क्रिकेटपटूंना तत्काळ राज्य सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश मिळाल्यानंतर लगेच सर्व खेळाडू आपआपल्या घरी मार्गस्थ झाले.
जिल्हास्तरीय क्रिकेट संघातील खेळाडूंची निवड करण्यासाठी येथे 31 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान काही सराव सामने होणार होते आणि याद्वारे काही स्थानिक खेळाडूंची निवड केली जाणार होती. मात्र, हा कॅम्प रद्द करण्यात आला असून कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विविध वयोगटातील 100 क्रिकेटपटूंना परत पाठवण्यात आले आहे. दरम्यान याबाबत माहिती मिळाल्यानंतर इरफान आणि अन्य क्रिकेटपटू आपआपल्या घरी परतले आहेत. कॅम्प पुन्हा कधी आयोजित केला जाईल याबाबत अजून माहिती मिळाली नसल्याचे इरफान पठाणने सांगितले. काश्मीरमधील अशांत वातावरणामुळे आणि दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेकरुंना खबरदारीचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे खबरदारी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रिकेटपटूंनाही परतण्यास सांगण्यात आले आहे.