नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांआधीच राज्यात धर्मांतराचा विषय चांगलाच तापला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसकडून अटकसत्र सुरु असून मंगळवारी इरफान ख्वाजा खान नामक तरुणाला बीड येथून अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला हा तरुण बालकल्याण मंत्रालयात दुभाष्या म्हणून कार्यरत आहे.
विशेष म्हणजे, एटीएसकडून अटक करण्यात आलेला इरफान ख्वाजा खान हा आतापर्यंत दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर दिसला आहे. २०१७ आणि २०२० मध्ये झालेल्या या कार्यक्रमांमध्ये त्याने मोदींचं भाषण इशाऱ्यांच्या माध्यमातून मूकबधिर मुलांपर्यंत पोहोचवलं होतं.
एका कार्यक्रमात भाषांतर केल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी इरफान याच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील दिली होती. एका नामांकित हिंदी वृत्तसंकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मात्र आता, धर्मांतर प्रकरणात गुंतलेला इरफान पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावर कसा पोहोचला, मोदींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना, एसपीजीला याबद्दल जराही कल्पना नव्हती का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.