माधव विद्वांस
मानववंशशास्त्रज्ञ, लेखिका, पुरातत्व संशोधक इरावती कर्वे यांचा आज स्मृतिदिन. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्नुषा व फर्गसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दि. धों. कर्वे यांच्या पत्नी होत. इरावती कर्वे यांचा जन्म ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) इरावती नदीच्या काठी वसलेल्या मिंगयानमध्ये (म्यिंज्यान) येथे 15 डिसेंबर 1905 रोजी झाला. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते.
इरावतीबाईंचे प्राथमिक व बी.ए. पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. त्यावेळी त्यांना रॅंग्लर र. पु. परांजपे यांचे मार्गदर्शन व साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहून एम.ए.ची पदवी मिळविली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. तेथे त्यांनी जर्मनीतील कैसर विल्यम इन्स्टिट्यूटमध्ये “द नॉर्मल ऍसिमेट्री ऑफ ह्यूमन स्कल'(मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता) हा प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेतली. तेथे असताना त्यांचा दि. धों. कर्वे यांच्याशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले.
काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिवाचे काम केले. 1939 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये समाजशास्त्र व मानवशास्त्र या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या. डेक्कन कॉलेजमध्ये प्रा. ह. धी. सांकलिया यांच्या सहकार्याने इरावती कर्वे यांनी पुरातत्व विद्येमधील आजच्या मानवशास्त्रीय संशोधनाचा पाया घातला व प्रारंभापासूनच हे संशोधन जागतिक पातळीच्या दर्जाचे व्हावे म्हणून प्रयत्न केले.
वर्ष 1949 मध्ये इरावती कर्वे व सांकलिया यांनी गुजरातमधील लांघणज या मध्याश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले. या ठिकाणी मानवी अवशेषही मिळाले असल्याने हे संशोधन पायाभूत ठरले. त्यांच्या “किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ या ग्रंथात त्यांनी भारतीय समाजरचनेच्या संदर्भात अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दल स्पष्ट विवेचन केले आहे.
वांशिक व भाषिक गटांच्या दरम्यानचे फरक त्यांच्या बाह्य शरीररचनेच्या व आनुवंशिक संरचनेच्या आधारे अभ्यासता येतील का, हा त्यांच्या संशोधनाचा मूळ गाभा होता. त्याला अनुसरून वर्ष 1961 मध्ये कर्वे यांनी “हिंदू सोसायटी न इंटरप्रिटेशन’ या आपल्या ग्रंथात महाराष्ट्रातील समाजरचनेचे प्रारूप एका आकृतीत दिले आहे. याशिवाय “लॅन्ड अँड पीपल ऑफ महाराष्ट्र’ हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ.
मानवांमधील सांस्कृतिक-जैविक विविधतेचा अभ्यास करण्यासाठी संख्याशास्त्रातील “मल्टी-व्हेरीएट’ पद्धतींचा वापर इरावती कर्वे यांनी केला. म्हणूनच एक समाजशास्त्रज्ञ असूनही प्रसंगी सहकाऱ्यांची कडवट टीका स्वीकारून त्यांनी समाजशास्त्रात जीवशास्त्रामधल्या आनुवंशिकतेचा अभ्यास चालूच ठेवला होता.
वर्ष 1967 मधील त्यांच्या “युगांत’ या पुस्तकातून व इतर लेखनातून त्यांनी वर्णव्यवस्था, जातिसंस्थेचा उगम आणि प्राचीन काळापासून भारतीय समाजात असलेले स्त्रीचे स्थान याबद्दलचे मूलभूत विचार मांडले. भारतीय समाजाची आजची रचना अशी का आहे, हा कर्वे यांच्या संशोधनाचा मूळ हेतू होता. त्या केवळ प्राचीनच नव्हे, तर तत्कालीन सामाजिक प्रश्नांचाही विचार करत होत्या. कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांवर त्यांनी केलेल्या लेखनात त्यांच्यामधील सामाजिक संवेदनशीलता दिसून येते. त्यांनी मराठीतून समाजशास्त्र या विषयाशी संबंधित सुमारे 12 ग्रंथ लिहिले तसेच इंग्रजीमध्येही सुमारे 12 ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
“युगांत’ या पुस्तकाला 1972 चा “साहित्य अकादमी’ तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देण्यात आला. 11 ऑगस्ट 1970 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.