लखनौ -केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी उत्तरप्रदेशच्या अमेठीत जागा विकत घेतली. त्या जागेवर लवकरच घर बांधण्याचा त्यांचा मानस आहे.
भाजपच्या नेत्या स्मृती यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला.
आता अमेठीच्या खासदार असणाऱ्या स्मृती यांनी मतदारसंघात हक्काचे घर बनवण्यासाठी पाऊल उचलले. स्वत:चे घर बांधता यावे यासाठी त्यांनी 12 लाख रूपये किमतीच्या जागेची खरेदी केली. दरम्यान, अमेठीत पत्रकारांशी बोलताना स्मृती यांनी गांधी परिवारावर आणि विशेषत: राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडले.
अमेठीतील आधीच्या कुठल्याच खासदाराने मतदारसंघात घर बांधले नाही. त्यापैकी कुणीच मतदारसंघात राहिले नाही. मात्र, निवडणुकीच्या प्रचारावेळी अमेठीत घर बांधण्याचे आश्वासन मी जनतेला दिले होते. त्याचे पालन मी केले आहे, असे त्या म्हणाल्या.
अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रदीर्घ काळ गांधी परिवारातील सदस्यांनी केले.