तेहरान – इराणने जुलै महिन्याच्या सुरूवातीला एमटी रियाह हे जहाज पकडले आहे. त्या जहाजावरील बारापैकी नऊ भारतीयांची सुटका इराणने केली आहे. तथापी एकूण 21 भारतीय अद्यापही इराणच्या ताब्यात आहेत. त्यातील तीन जण एमटी रियाह या जहाजावरील असून अन्य 18 जण ब्रिटनच्या तेलवाहू जहाजावरील आहेत. इम्पेरो असे या ब्रिटीश तेलवाहू जहाजाचे नाव आहे. काल इराणने भारतीय दुतावासाला त्या व्यक्तींशी संपर्क साधण्याची अनुमती दिली होती. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात जो संघर्ष सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर इराणने ही जहाजे पकडली आहेत.
दरम्यान ब्रिटीश नौदलाने ग्रेस 1 नावाचे एक इराणी जहाज स्पेनच्या समुद्र किनाऱ्यावर पकडले आहे त्यातही 24 भारतीय कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. त्यांचीही अजून सुटका झालेली नाही. बुधवारी भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या जहाजावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची मदत दिली जात असून त्यांच्या परतीच्या प्रवासासाठीची कागदपत्रेही उच्चायुक्त कार्यालयातून दिली जातील अशी माहिती भारत सरकारच्यावतीने देण्यात आली. या जहाजावर ठेवण्यात आलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही गोंधळाची स्थिती नाही, ते स्थीर आहेत आणि काळजी मुक्त आहेत अशी माहितीही सरकारतर्फे देण्यात आली आहे.