सातारा: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आहेत. दरम्यान यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील आयपीएस अधिकार्यांनी हजेरी लावल्याने नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे लक्ष लागून राहीले आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री देशमुख हे आज पुणे येथील पोलीस मुख्यालयात करोनाच्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आले आहेत. तसेच ‘लोक भावनांचे सर्वेक्षण – पुणे पोलीस’ या पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिपंरी चिंचवडवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह अनेक अधिकारी हजर होते.
हा कार्यक्रम संपल्यानंतर गृहमंत्री पुणे येथील विश्रामगृहावर पुणे शहर, सोलापूर, पिपंरी येथील पोलीस आयुक्तांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. दरम्यान गृहमंत्र्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. सुहास वारके यांनाही बोलावल्याची माहिती असून त्यांच्यासोबत इतर आयपीएस अधिकार्यांनीही हजेरी लावल्याने सध्या मंत्रालयात सुरू असलेल्या आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांच्या लगबगीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
यावेळी गृहमंत्र्यांनी पन्नास वर्षा पुढील 23 हजार पोलिसांना पोलीस ठाण्यातच काम तर पंचावन्न वर्षा पुढील 12 हजार पोलिसांना आवश्यकतेनुसार घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान घरी राहणार्या पोलिसांना याकाळातील पगार देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.