नवी दिल्ली – सरलेल्या 2021 वर्षांमध्ये 20 वर्षात प्रथमच मोठ्या प्रमाणात आयपीओ जारी करण्यात आले आणि नव्या कंपन्यांची शेअर बाजारावर यशस्वी नोंदणी झाली. 2022 मध्येही विविध कंपन्या आयपीओसाठी रांगेत असून या कंपन्या 2022 मध्ये किमान 1.5 लाख कोटी रुपये उभे करणार असल्याचे दिसून येते.
2021 मध्ये जगभरातील रिझर्व्ह बॅंकांनी भांडवल सुलभता जारी केली होती. त्याचबरोबर आगामी काळात निर्देशांक वाढतील या आशेने गुंतवणूकदारांनी प्रचंड गुंतवणूक केली. त्यामुळे 2021 मध्ये आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी 1.2 लाख कोटी रुपये उभे केले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था विस्तारत आहे. त्याचबरोबर भारतातील गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे 2022 मध्येही आयपीओची संख्या वाढणार आहे.
त्यामध्ये अर्थातच भारतीय विमा महामंडळाचा म्हणजे एलआयसीच्या आयपीओचा मोठा वाटा असणार आहे. एलआयसी आयपीओच्या माध्यमातून किमान 1.2 लाख कोटी रुपये जमा करणार असल्याचे दिसून येते. मात्र भारतासह विविध देशात महागाई वाढणार असल्यामुळे त्याचा शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो. असे असले तरी भारतातील एकूण परिस्थिती पाहता भारतात आयपीओची संख्या कमी होणार नाही, असे विश्लेषकांनी सांगितले.