नवी दिल्ली -आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व विवो कंपनीकडून टाटा समूहाकडे आल्यामुळे बीसीसीआय मालामाल होणार आहे. विवोचा करार 2200 कोटींचा होता आता हे हक्क टाटा समूहाकडे आल्यामुळे बीसीसीआयच्या नफ्यात प्रचंड वाढ होणार आहे.
टाटा समूह आगामी दोन वर्षांसाठी सुमारे 670 कोटी मोजणार आहे; तर करार मध्येच संपवल्यामुळे विवो बीसीसीआयला 454 कोटी देणार आहे. 2022 आणि 2023 या मोसमासाठी बीसीसीआयला प्रायोजक रकमेतून 1124 कोटींचा फायदा होणार आहे. तसेच मध्येच करार संपवल्यामुळे विवो दोन वर्षांचे मिळून 183 कोटी बीसीसीआयला देणार आहे.
विवोचा करार 2018 ते 2022 या चार वर्षांसाठी 2 हजार 200 कोटी रुपयांचा होता. मात्र, 2020 साली गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले व त्यामुळे 2020 सालच्या आयपीएल स्पर्धेला त्यांचे प्रायोजकत्व नव्हते. 2021 साली पुन्हा त्यांच्याकडेच हे हक्क आले होते. स्पर्धेत दोन नवे संघ दाखल झाल्यामुळे विवोला तब्बल 996 कोटी द्यावे लागले असते.
टाटा समूहाने आयपीएलशी दोन वर्षांसाठी केलेल्या कराराची विभागणी दरवर्षी 335 कोटी असून, त्यात 301 कोटी प्रायोजकतेचे हक्क आणि सामन्यांची संख्या वाढल्यामुळे अतिरिक्त 34 कोटी टाटा समूह देणार आहे. त्यामुळेच प्रायोजकता विवोकडे काय किंवा टाटा समूहाकडे बीसीसीआयच फायद्यात आहे असेच चित्र दिसत आहे.