चेन्नई – भारतीय संघाकडून एकेकाळी अव्वल कामगिरी केलेल्या मात्र, आता वय झालेल्या काही क्रिकेटपटूंवर आयपीएलच्या यंदा झालेल्या लिलावात कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. पण अखेर हरभजनसिंग, केदार जाधव, चेतेश्वर पुजारा यांच्यासह आणखी काही खेळाडूंवरही बोली लावली गेली व त्यांना विविध संघांनी आपल्या ताफ्यात घेतले. आता त्यांना यंदाच्या मोसमात दर्जाला साजेशी कामगिरी करावी लागेल अन्यथा त्यांची ही अखेरची आयपीएल स्पर्धा ठरेल.
हरभजनवर पहिल्या फेरीमध्ये बोली लागली नव्हती. मात्र, दुसऱ्या फेरीअखेर कोलकाता नाईट राडर्सने त्याला आपल्या संघात स्थान दिले. 40 वर्षीय हरभजनला त्याच्या बेस प्राईसवरच म्हणजे दोन कोटी रुपयांत खरेदी केले गेले. गतवर्षी हरभजनने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर चेन्नईने त्याला रिलीज केले होते.
गेल्या 13 वर्षांपासून आयपीएल खेळणाऱ्या हरभजनने मुंबई व चेन्नई अशा दोन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो संघात असताना दोन्ही संघानी प्रत्येकी चार वेळा आयपीएल जिंकली आहे. तो आपल्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा आयपीएलच्या लिलावात उतरला. हरभजनने 2008 पासून 2017 पर्यंत मुंबईचे प्रतिनिधित्व केले तर गेल्या तीन वर्षांपासून तो महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईच्या संघात होता. हरभजनने 160 आयपीएल सामन्यांतून 150 बळी घेण्याची किमया साधली आहे.
अर्जुन अखेर मुंबईकडे
आयपीएलच्या यंदाच्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला मुंबई इंडियन्सने घेतले. लिलावाच्या पहिल्या फेरीत अर्जुनवर एकाही संघाने बोली लावली नाही. अखेरच्या फेरीत अर्जुनला त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच 20 लाख रुपयांना मुंबईने खरेदी केले.
केदार हैदराबादकडे
महाराष्ट्राचा मधल्या फळीतील फलंदाज व चेन्नई संघाने रिलीज केलेल्या केदार जाधवला अखेर सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात घेतले. त्याला गेल्या वर्षीच्या सुमार कामगिरीनंतर चेन्नई संघाने रिलीज केले होते. त्यावेळी त्याच्या संथ फलंदाजीमुळे प्रचंड टीकाही झाली होती.