मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमाचा प्रारंभ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार असून स्पर्धा जूनच्या पहिल्या आठवड्यात संपेल, असे संकेत बीसीसीआयने दिले आहे. पुढील वर्षापासून या स्पर्धेत अहमदाबाद व लखनौ हे दोन नवे संघ सहभागी होत असल्याने सामन्यांची संख्या व स्पर्धेचा कालावधी वाढणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे पुढील वर्षीच्या मोसमात सलामीच्या सामन्यात त्यांना खेळण्याची संधी मिळणार आहे. पुढील वर्षीपासून 8 ऐवजी 10 संघ सहभागी होणार असल्याने सामन्यांची संख्या 60 वरून 74 होणार आहे.
यावेळी ही संपूर्ण स्पर्धा भारतातच होणार आहे.
पुढील मोसमातील आयपीएल स्पर्धेला 2 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता असून पहिला सामना चेन्नईत होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 4 जूनला खेळवला जाइल, असेही सांगण्यात येत आहे. प्रत्येक संघाला 14 सामने खेळावे लागणार आहेत.
7 सामने घरच्या मैदानावर तर 7 सामने बाहेर खेळवले जातील. सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोणत्या संघाशी होईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, त्यांची लढत मुंबई इंडियन्सशीच होऊ शकते, असे मानले जात आहे.