मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षी होत असलेल्या मोसमापूर्वीच लोकेश राहुल व रशिद खान यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. संघ मालकांनी आपल्या संघातील ज्या खेळाडूंना मुक्त केले आहे, त्याची यादी सादर करण्यापूर्वीच काही संघ मालकांना विविध खेळाडूंच्या वर्तनावरुन मनस्ताप सहन करावा लागत आहे. या स्पर्धेत दोन नवे संघ दाखल होत असून त्यांनी या दोन खेळाडूंशी संपर्क साधल्यामुळे त्यांचे संघ मालक व्यथित झाले आहेत व त्यांनी यादी जाहिर होण्यापूर्वीच खेळाडूंशी संपर्क कसा केला, असा सवाल करत बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
आयपीएल मेगा लिलावापूर्वीसर्व संघांना त्यांनी कायम ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे मंगळवारपूर्वी बीसीसीआयला द्यावी लागणार होती. राखीव खेळाडूंबाबतची ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मेगा लिलावाची तारीख निश्चित केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राहुल आणि राशिद खान यांना लखनौ आणि अहमदाबादच्या दोन नवीन संघांनी या खेळाडूंशी संपर्क साधल्याने संघ मालकांनी संताप व्यक्त केला आहे.पंजाब किंग्जने राहुलची आणि सनरायझर्स हैदराबादने राशिदची बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
हे दोन नवे संघ राहुल आणि राशिद यांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे संघाच्या भविष्यातील आराखड्यांवर संकट निर्माण होत आहे, असे पंजाब आणि हैदराबाद संघाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
लेखी तक्रार आल्यावरच निर्णय…
दरम्यान, आम्हाला कोणतीही अधिकृत लेखी तक्रार मिळालेली नाही. लखनौ संघ खेळाडूंशी संपर्क साधत असल्याची तक्रार केवळ तोंडी मिळाली आहे. आम्ही त्याची चौकशी करत असून त्यात तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई करू. सध्याच्या संघांनी खेळाडूंशी बीसीसीआयशी संवाद न साधता संपर्क करणे योग्य नाही, असे मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.