दुबई – लोकेश राहुलकडे विराट कोहली व रोहित शर्मापेक्षाही जास्त गुणवत्ता आहे. त्याला जितकी जास्त संधी मिळेल तेव्हढे भारतीय संघासाठी लाभदायक ठरेल, असे मत भारताचा माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात राहुलने चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील तसेच या संपूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पाहता त्याच्याकडे कोहली व रोहितपेक्षाही जास्त विविधतेचे फटके आहेत. राहुलकडे रोहित व कोहलीपेक्षा जास्त क्षमता आहे. असेही गंभीर म्हणाला.
राहुल यंदा दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेत पंजाबचे नेतृत्व करत आहे. यंदाच्या मोसमात त्याने 14 सामन्यांमध्ये 624 धावा केल्या आहेत. 600 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा राहुल या मोसमातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने या हंगामात 6 अर्धशतके केली आहेत.