मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. या लिलाव प्रक्रियेबाबत सर्व संघांना 20 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक संघाला आपल्या संघातील सोल्ड व अनसोल्ड खेळाडूची यादी आयपीएल प्रशासकीय समितीला द्यावी लागणार आहे.
यंदाची स्पर्धा भारतातच होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी करोनाच्या धोक्यामुळेही स्पर्धा अमिरातीत खेळवली गेली होती. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र, त्यात साखळी फेरीतील सामन्यांची ठिकाणे, तारीख तसेच अंतिम सामन्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच ही लिलाव प्रक्रिया कुठे होणार, याबाबतही अद्याप काहीही ठरवण्यात आलेले नाही. मात्र, लिलाव प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
इंग्लंडचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात पाच कसोटी, 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेपासून होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 5-9 फेब्रुवारी तर दुसरा सामना 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान खेळण्यात येणार आहे. या दोन्ही सामन्याचे आयोजन चेन्नईमध्ये खेळण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएल लिलाव प्रक्रिया चेन्नईत पार पडण्याची शक्यता आहे.
या लिलाव प्रक्रियेसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक रक्कम आहे. म्हणजेच पंजाबचे बजेट हे 16 कोटी रुपयांचे राहणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचे बजेट हे 15 कोटी 75 लाख राहील. सनरायजर्स हैदराबादचे बजेट 10 कोटी आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचे 9, कोलकाता नाईट रायडर्सचे 8, रॉयल चॅलेंजर बेंगळुरुचे 6 कोटी 40 लाख तरस मुंबई इंडियन्सचे 1 कोटी 95 लाख इतकेच बजेट राहील. की रक्कम शेष आहे.
नवोदीतांना जास्त संधी मिळणार
यंदाच्या मोसमात जवळपास सर्वच संघ खेळाडूंची अदलाबदली करण्याची शक्यता आहे. गेल्या मोसमात अनेक नवोदीत खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी सर्व संघ उत्सूकआहेत.