नवी दिल्ली – गतविजेत्या मुंबई इंडियन्स गुरुवारी येथे आयपीएल सामन्यात सातत्याचा अभाव असलेल्या राजस्थान रॉयल्सशी सामना करण्यास सज्ज असेल. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी सुधारली तरच मुंबईला विजयाची आशा करता येईल; अन्यथा राजस्थानसाठी विजयी मार्गावर परतणे सोपे असेल.
चेन्नईत पंजाब किंग्जविरुद्ध नऊ गडी राखून पराभव पत्करावा लागलेला असल्याने सलगच्या पराभवाने रोहित शर्माच्या मुंबईचे मनोधैर्य खचलेले असेल. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने आतापर्यंतच्या स्पर्धेत तीनदा पराभव पत्करला आहे आणि मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सहा गडी राखून विजय मिळवला आहे.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एकूण 201 धावा करत स्पर्धेची सुरुवात तर चांगली केली आहे पण अद्याप त्याला कोणतीही मोठी खेळी करता आलेली नाही. सलामीचा साथीदार क्विंटन डी कॉक आणि रोहितच्या जोडीने मोठी भागीदारी रचण्याची आशा चाहत्यांना आहे. परंतु सूर्यकुमार यादव (154 धावा), ईशान किशन (73), हार्दिक पांड्या (36), कृणाल पांड्या (29) आणि किरोन पोलार्ड (65) या फटकेबाज फलंदाजांनी अद्याप त्यांच्या लौकिकाला साजेशा खेळ केलेला नाही. त्यामुळेच मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांना आता आपली गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल.
गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट (6 विकेट) आणि जसप्रीत बुमराह (4) यांची वेगवान जोडी अपवादात्मक ठरली आहे. लेगस्पिनर राहुल चहर (9) आणि कृणाल (3) देखील प्रभावी ठरले आहेत. त्यांच्याकडूनही सातत्याची अपेक्षा आहे. तसेच हार्दिक पूर्णपणे फलंदाज म्हणून खेळत असतानाही पोलार्ड पाचवा किंवा सहावा गोलंदाज म्हणून वापरला जातो.
दुसरीकडे राजस्थानकडे विशेषत: जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन आणि ऍन्ड्य्रू टाय या प्रमुख परदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीत विचार करण्यासारखे बरेच मुद्दे आहेत. राजस्थानकडे मुख्य समस्या आहे ती सलामीच्या फलंदाजांची. मनन वोहरा (42 धावा) आणि यशस्वी जयस्वाल (22 धावा) चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयशी ठरले. इंग्लंडचा जोस बटलर व कर्णधार संजू सॅमसन (187 धावा) सातत्यपूर्ण खेळत नसूनही संघात सर्वाधिक धावा सॅमसनच्याच आहेत. शिवम दुबे, डेव्हिड मिलर आणि रियान पराग या खेळाडूंना त्यांच्या आवडीच्या क्रमांकावर फलंदाजी करून आपली उपयुक्तता पटवून द्यावी लागेल.
अष्टपैलू ख्रिस मॉरिसने (9 विकेटस, 48 धावा) अशी चांगली कामगिरी नोंदवली असली, तरी त्याला आपली जबाबदारी ओळखूनच खेळावे लागेल. डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकरियाने (9 विकेट) आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे; तर जयदेव उनाडकट आणि मुस्तफिजुर रहमान (प्रत्येकी 4 विकेट्स) यांची अनुभवी जोडी चांगली कामगिरी करत आहे. लेगस्पिनर राहुल तेवतियाला पाच सामन्यांतून फक्त एक विकेट मिळाली आहे तर श्रेयस गोपाळला अद्याप एकही विकेट मिळालेली नाही.
अमित मिश्रानी दिल्लीसाठी केलेली कामगिरी लक्षात घेऊन रॉयल्सने एमआयची फलंदाजी रोखण्याचे लक्ष्य ठेवले असेल तर तेवतियाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
सामन्याची वेळ
दुपारी : 3ः30
ठिकाण ः
अरुण जेटली स्टेडियम,
नवी दिल्ली
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर