मुंबई – करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील मुंबईत होणाऱ्या सामन्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबईसह राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना यजमान शहर म्हणून मुंबईचेच एकमेव केंद्र ठेवणे योग्य ठरणार नाही, असे मत बीसीसीआयच्या बैठकीत अनेक सदस्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी बीसीसीआय चार ते पाच ठिकाणांचा विचार करीत आहे.
यापूर्वी वानखेडे, ब्रेबोर्न, डीवाय वाय पाटील व मुंबईतील रिलायन्स स्टेडियमवर बायोबबल सुरक्षा निर्माण करून आठ आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असल्यामुळे एकपेक्षा जास्त केंद्रे असणे बीसीसीआयने फायद्याचे ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.
आयपीएल सुरू होण्यास मोठा कालावधी बाकी आहे. मात्र, निश्चितपणे काही निर्णय घेण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे. मुंबईत करोना वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता या शहरांचाही विचार सुरु आहे. तसेच अहमदाबादमध्ये आयपीएलचे प्ले ऑफचे सामने तसेच अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेला एप्रिलमध्ये प्रारंभ होण्याचे सांगितले जात असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.