मुंबई – आयपीएल स्पर्धेचे यंदाच्या मोसमातील साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रत होणार असून बाद फेरीचे सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
करोनामुळे आयपीएलचे सामने एकाच राज्यात खेळवण्याचा निर्णय यावेळी बीसीसीआय घेण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी मैदाने एकमेकांपासून कमी अंतरावर असल्याने साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात होणार आहेत. आयपीएल एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर जून महिन्याच्या सहा तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.
वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डी. वाय. पाटील स्टेडियम, नवीन मुंबई येथील रिलायन्स क्रिकेट स्टेडियम व पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियममध्ये आयपीएल सर्वाधिक सामने होणार असल्याचे सांगितले जात आहे. साखळी सामने यावेळी महाराष्ट्रामध्ये खेळवण्यात येणार आहेत. तसेच बाद फेरीतील सामने यावेळी अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये भरवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.
यंदाची आयपीएल 11 किंवा 14 एप्रिलपासून सुरू करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. गेल्या वर्षी करोनाचा धोका वाढत असल्यामुळे भारतातून ही स्पर्धा अमिरातीत हलवण्यात आली होती. यंदा मात्र, भारतामध्येच चाहत्यांना आयपीएलचा आनंद लुटता येणार आहे.
तब्बल 139 खेळाडूंचा लिलाव
आयपीएलचा लिलाव हा 18 फेब्रुवारीला चेन्नई येथे होणार आहे. यात तब्बल 139 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या दिवशी सर्वं संघांचे मालक आणि अधिकारी या लिलावाला उपस्थित राहतील. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूला किती रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान द्यायचे, हे ठरणार आहे.