दुबई – सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यात आज होणारी लढत दोन्ही परदेशी खेळाडूंमध्ये रंगणार आहे. हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर व राजस्थानचा स्टिव्ह स्मिथ या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्येच नेतृत्वाचा सामना आज रंगणार आहे.
आयपीएल स्पर्धेत या दोन्ही संघांनी एकेकदा विजेतेपद पटकावले होते. यंदा मात्र, त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. वॉर्नरचा संघ त्याच्याच फलंदाजीवर अवलंबून आहे. तसेच त्याला साथ देताना इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो वगळता संघातील अन्य फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा लाभ घेतलेला नाही.
मनीष पांडे, प्रियम गर्ग व अभिषेक शर्मा यांच्याकडे गुणवत्ता आहे. मात्र, आजवर त्यांना सरस खेळ करता आलेला नाही, त्यामुळे हैदराबादला हातात असलेले सामनेही गमवावे लागले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या गोलंदाजांनाही चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसनच्या समावेशाने त्यांची फलंदाजी भक्कम झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्याला दोन्ही सामन्यांत अपयशाचाच सामना करावा लागला आहे.
वॉर्नर व बेअरस्टो यांना जेव्हा अपयश येते तेव्हा त्यांचा पराभव निश्चित झालेला आहे. संदीप शर्मा व रशिद खान यांचा अपवाद वगळता त्यांची गोलंदाजी देखील अन्य संघांच्या मनाने कमकुवत आहे. या दोन खेळाडूंचा समावेश झाला तर त्यांच्याकडे मधल्या फळीतील फलंदाज व गोलंदाजाची उणीव भरून निघणार आहे.
राजस्थानने मात्र, स्मिथच्या नेतृत्वाखाली यंदाच्या स्पर्धेत सकारात्मक कामगिरी केली आहे. त्यांना सातत्याने विजय मिळाले नसले तरीही त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांची फलंदाजी यंदाच्या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य मानली जात आहे.
स्मिथसह संजू सॅमसन व गेल्या सामन्यातून भरीव कामगिरी केलेला जोस बटलर यांच्यावरच त्यांची मदार राहणार आहे. अंकित राजपूत व जयदेव उनाडकट यांना आजच्या सामन्यासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू करत असल्याने त्यांना एकमेकांचे कमकुवत दुवे माहिती असल्याने ज्याचे नेतृत्व सरस ठरेल त्याचाच संघ विजय मिळवेल.
जयस्वाल यशस्वी होणार का..
यंदाच्या स्पर्धेत हैदराबादकडून खेळत असलेला यशस्वी जयस्वालने अद्याप सरस कामगिरी केलेली नाही. या स्पर्धेत चेन्नई विरुद्ध पदार्पण केलेला जयस्वाल आजच्या सामन्यात तरी संघासाठी योगदान देताना दिसणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेत अद्याप केवळ दोनच सामने खेळले असले तरीही त्याची देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरी पाहूनच त्याला राजस्थानने आपल्या संघात घेतले आहे.