आबूधाबी – कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध कस लागणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या बेंगळुरू संघाला यंदा तरी सरस कामगिरी करता येणार का हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेंगळुरू संघात दिग्गज फलंदाज असतानाही त्यांना या स्पर्धेचे एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. खुद्द कोहलीसह एबी डिविलियर्स, शिवम दुबे, फिलिप्स या प्रमुख फलंदाजांना सातत्याने अपयश येत असल्याने त्यांची फलंदाजी केवळ ऍरन फिंच व देवदत्त पडीक्कल याच जोडीवर अवलंबून आहे. डीविलियर्सने थोडीफार चमक दाखवली आहे.
फिंच व पडीक्कल बाद झाल्यानंतर त्यांच्याकडे फलंदाजांची सशक्त फळीच नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. केवळ कागदावरच त्यांची फलंदाजी बलाढ्य वाटते पण प्रत्यक्ष मैदानावर त्यांना अपयशच येत आहे. गोलंदाजीतही त्यांच्या नवदीप सैनी व वॉशिंग्टन सुंदर यांच्या व्यतरीक्त अन्य गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवता आलेले नाही.
जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज डेल स्टेन त्यांच्या ताफ्यात असूनही त्याला यश आलेले नाही. त्याला चक्क संघातून बाहेरही बसवण्यात आले होते. लेगस्पीनर यजुवेंद्र चहलकडून त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. राजस्थानविरुद्ध ख्रिस मॉरीसला संधी मिळणार का हे पहावे लागणार आहे.
याउलट राजस्थानचा संघ सातत्याने एकेका सामव्यात सरस कामगिरी करत आहे. कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, राहुल तेवतिया, रॉबिन उथप्पा व टॉम कुरेन यांच्यामुळे त्यांची फलंदाजी किंग्ज इलेव्हन पंजाबप्रमाणे अत्यंत बलाढ्य समजली जात आहे. त्यातही संजू सॅमसन व तेवतिया यांना कसे रोखायचे याचा अभ्यास कोहलीच्या संघाला करावा लागणार आहे.
पहिल्या सामन्यापासूनच सॅमसनने अत्यंत आक्रमक फलंदाजी करत प्रत्येक सामन्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. यांना बाद करण्यासाठी कोहलीच्या संघाला चमत्कारच घडवावा लागणार आहे.
फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही बेंगळुरू कमजोर
या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यात बेंगळुरू संघाला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात अपयश आले आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यांना याच ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसला आहे. त्यातून काहीतरी बोध घेउन ते सरस कामगिरी करतील का हेच या सामन्यातून पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे