दुबई – आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक चारवेळा विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही करंडक पटकावेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ज्या-ज्या वेळी मुंबईचा संघ प्ले-ऑफमध्ये क्वालिफायर 1 मध्ये सामना खेळला आहे त्या प्रत्येक वेळी त्यांनीच विजेतेपद पटकावले आहे हे आकडेवारीवरुन सिद्ध होत आहे.
यंदाही ते या गटातील क्वालिफायर 1 सामना खेळणार असल्याने मुंबईच्या विजेतेपदाबाबत सोशल मीडियावर तर्क मांडले जात आहेत. यंदाच्या स्पर्धेत मुंबईने 18 गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आहे. त्यामुळे मुंबईचा संघ 5 नोव्हेंबरला पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे. यात जो संघ जिंकेल तो थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. पराभूत होणाऱ्या संघाला एलिमिनेटरचा सामना खेळण्याची आणखी एक संधी मिळेल.
मुंबईने 4 वेळा विजेतेपद मिळवले आहे. त्यांनी 2013, 2015, 2017 व 2019 अशी चार वर्षे ही स्पर्धा जिंकली असून यातील प्रत्येक वर्षी मुंबईने क्वालिफायर 1 मध्ये सामना खेळला होता. यंदाही त्यांना हा सामना खेळायचा आहे व त्यामुळेच विजेतेपदही तेच मिळवतील असा विश्वास चाहते व्यक्त करत आहेत.
यंदाच्या स्पर्धेत सुरुवातीच्या काही सामन्यांतील कामगिरी पाहता मुंबईने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांचे फलंदाजही भरात आहेत, तसेच 8 व्या क्रमांकापर्यंत त्यांची फलंदाजी असल्याने तेच यंदाही विजेतेपद मिळवतील, असा विश्वासही चाहते व्यक्त करत आहेत.