दुबई – आयपीएल स्पर्धेतील सर्व संघांचे (दि.13, मंगळवार) सात सामने झाले आहेत आणि आता प्ले-ऑफचे समीकरण सुरू झाले आहे. स्पर्धेच्या इतिहासात सातत्याने वर्चस्व राखलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मात्र प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर खूप मोठा चमत्कार घडवावा लागणार आहे.
यंदा मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स संघांनी गुणतालिकेत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळवले आहे. दोन्ही संघांचे गुण जरी समान असले तरीही मुंबईची धावगती सरस आहे. या दोन संघांचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित आहे. आता उर्वरित दोन स्थानांवर कोण असेल याचे गणित आता लक्षवेधी ठरणार आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू तिसऱ्या स्थानावर असून कोलकाता नाईट रायडर्सने चौथे स्थान मिळवले आहे. आरंभशूर किंग्ज इलेव्हन पंजाब अखेरच्या स्थानावर तर, चेन्नईचा संघ शेवटून दुसऱ्या स्थानी आहे. त्यांना जर प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांच्या स्पर्धेतील उर्वरित सात सामन्यांत त्यांना किमान पाच सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. असे घडले तर तो एक चमत्कारच घडेल.
After Match 28 of #Dream11IPL, @RCBTweets are now 3rd on the Points Table. pic.twitter.com/7i8hcUGUp6
— IndianPremierLeague (@IPL) October 12, 2020
सध्यातरी हे अशक्य वाटत आहे. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स तर पाचव्या स्थानावर सनरायजर्स हैदराबाद आहे. त्यांनाही पुढील सामने जिंकले तर प्ले-ऑफची संधी आहे. पुढील सामन्यांतील त्यांची कामगिरीच त्यांचे स्थान ठरवणार आहे.