आबूधाबी – आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. मुंबईच्या तगड्या फलंदाजीमुळे त्यांचेच पारडे जड राहण्याची शक्यता आहे. पॉवर हिटिंगच्या स्पर्धेत मुंबईची बाजू काहीशी वरचढ आहे. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान राजस्थानसमोर राहणार आहे.
राजस्थानकडे कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, राहुल तेवतिया असे आक्रमक फलंदाज असले तरीही त्यांना यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मिलर, रीयान गर्ग यांच्या अपयशाची चिंता आहे.
गोलंदाजीची बाजू देखील जोफ्रा आर्चर व श्रेयस गोपाल यांनीच आतापर्यंत झालेल्या सामन्यांत सांभाळली आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत प्रचंड भरात असलेला जयदेव उनाडकट याच्यासह टॉम कुरेन यांचीही गोलंदाजीतील कामगिरी अत्यंत सुमार होत असल्याने स्मिथला नव्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.
अंकित राजपूत व वरुण ऍरॉन यांना आजच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर अष्टपैलू मनन व्होरा यालाही संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. सॅमसन, स्मिथ व तेवतिया अपयशी ठरले तर राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागतो हे या आधीच्या काही सामन्यांत दिसून आले असल्याने फलंदाजी बळकट करण्याची तयारी स्मिथ दाखवू शकतो.
दुसरीकडे मुंबईची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण चांगलेच उंचावले आहे. जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, जेम्स पॅटिंन्सन यांनी सातत्याने भेदक गोलंदाजी केली आहे. त्यातही बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये केलेली गोलंदाजी मुंबईच्या विजयांमध्ये निर्णायक ठरली आहे. तसेच कृणाल पंड्या व राहुल चहर यांनीही फिरकी गोलंदाजीवर तगड्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळवले असल्याने त्यांचा सामना करण्याचे आव्हान राजस्थानसमोर आहे.
यंदाच्या स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पाठोपाठ मुंबईचीच फलंदाजी जास्त सशक्त आहे. त्यांच्याकडे पॉवर हिटर्स फलंदाज अन्य संघांपेक्षा जास्त असल्याने त्यांनी सातत्याने प्रतिस्पर्धी संघांवर दडपण राखले आहे. अन्य संघांच्या तुलनेत राजस्थानची गोलंदाजी यंदाच्या स्पर्धेत फारशी सरस झालेली नाही. त्यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, कॅरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, इशान किशन व सौरभ तिवारी यांना कसे रोखायचे हा मोठा प्रश्न राजस्थनसमोर निर्माण झाला आहे.