बीसीसीआयकडे संघमालकांची मागणी
नवी दिल्ली -आयपीएल स्पर्धेसाठी अमिरातीत गेल्यानंतर सहभागी होत असलेल्या सर्व संघांच्या खेळाडूंना तीन दिवसांसाठीच विलगीकरणात ठेवले जावे, अशी मागणी सर्व संघमालकांनी अमिराती सरकार व बीसीसीआयकडे केली आहे.
स्पर्धा होणार असे निश्चित झाले त्यावेळी 14 दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. करोनाचा धोका अत्यंत कमी असल्याने हा कालावधी 6 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. मात्र, हा कालावधी जास्त असल्याचे बीसीसीआयकडे केलेल्या मागणीत म्हटले आहे. जर सर्व खेळाडूंची व सपोर्ट स्टाफसह कुटुंबीयांची अमिरातीत जाण्यापूर्वी करोना चाचणी करण्यात येत आहे तसेच त्यानंतर खेळाडू 20 ऑगस्टला अमिरातीला रवाना होणार आहेत मग पुन्हा 6 दिवसांचे विलगीकरण कशासाठी, असा सवालही करण्यात येत आहे.
याचबरोबर खेळाडूंच्या सुविधा, निवास व त्यांना दिले जाणारे जेवण, नाश्ता आदी गोष्टी कोणत्याही संपर्काशिवाय दिल्या जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापरही करण्यात येणार आहे. मग विलगीकरणाचा कालावधी जास्त नसावा, असेही या मागणीत नमूद करण्यात आले आहे.