शारजा – आयपीएल स्पर्धेतील सर्वात समतोल संघ अशी ओळख असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सामना होत असून कोलकाताच्या फलंदाजांना रोखण्याचे मुख्य आव्हान दिल्लीसमोर राहणार आहे.
या स्पर्धेत कोलकाताने आतापर्यंत झालेल्या सामन्यात संमिश्र यश मिळवले आहे. शुभमन गील. सुनील नरेन, कर्णधार दीनेश कार्तिक, आंद्रे रसेल, नितीश राणा व इयान मॉर्गन असे भक्कम फलंदाज त्यांच्या संघात असूनही अद्याप कार्तिक, नरेन व राणा यांना दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यातच फलंदाजीच्या क्रमावरून कर्णधार कार्तिक व रसेल यांच्यात वाद निर्माण झाल्याचे बोलले जात असल्याने त्यांना दिल्लीला आव्हान कसे द्यायचे यासाठी अभ्यास सरावा लागणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत आजवर झालेल्या सामन्यात त्यांची पूर्ण मदार गील व मॉर्गन यांच्यावरच राहिली आहे. त्यामुळे त्यांचे मधल्या फळीतील फलंदाज कशी कामगिरी करतात त्यावरच त्यांना मोठी धावसंख्या गाठून दिल्लीसमोर आव्हान निर्माण करता येणार का हे स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे त्यांच्या गोलंदाजीतील कच्चे दुवेही समोर आले आहेत. शिवम मावी व कमलेश नागरकोटी यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यानेही सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरीही दिल्लीची भक्कम फलंदाजी पाहता त्यांना अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे. नरेन सध्या अपयशी ठरत असला तरीही त्यांच्याकडे कुलदीप यादवचा पर्याय असल्याने फिरकीची चिंता नसली तरीही दिल्लीचे फलंदाज त्यांना चोख उत्तर देण्याची शक्यता आहे.
दिल्लीची फलंदाजी कागदावर बलाढ्य असली तरीही त्यांना सलामीवीर शिखऱ धवन, ऋषभ पंत, शेमरॉन हेटमायर यांच्याकडून सरस कामगिरीची गरज आहे. आतापर्यंत तरी धवन व हेटमायरला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पृथ्वी शॉ, मार्कस स्टोनिस व कर्णधार श्रेयस अय्यर यांनीच संघाच्या फलंदाजीची सुत्रे सांभाळली आहेत. मात्र, मधल्या फळीत त्यांना संघाचा डाव सावरू शकेल अशा फलंदाजाची नितांत गरज आहे. गोलंदाजीत अनरीच नॉर्जे व स्टोनिस यांनी अचूक गोलंदाजी केली असली तरीही अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा कशी गोलंदाजी करतो यावरच त्यांच्या विजयाच्या शक्यता अवलंबून राहणार आहेत.
रहाणेला संधी मिळणार का ?
हेटमायर व पंत अपयशी ठरत असूनही दिल्ली संघाने अद्याप मधल्या फळीतील अव्वल फलंदाज अजिंक्य रहाणे याला संधी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या संघ व्यवस्थापनावर टीकाही झाली आहे. आता हे दोघे सरस कामगिरी करण्यात अपयशी ठरत असल्याने आजच्या सामन्यात तरी रहाणेला संघात स्थान मिळणार का हा प्रश्न कायम आहे.