नवी दिल्ली – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला अद्याप एकदाही आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही यासाठी केवळ कर्णधार विराट कोहली हाच जबाबदार असल्याची टीका संघाचे माजी प्रशिक्षक रे जेनिंग्ज यांनी केली आहे.
कोहलीला कोणताही सल्ला दिला तरी त्याची अंमलबजावणी करण्याची त्याची तयारीच नसायची. तो कोणाचेही ऐकत नव्हता. त्याच्या मनाप्रमाणे संघ निवड केली जाते. त्यात बदल सांगितला तरीही त्याची भूमिका नकाराचीच असायची. त्याच्या याच एककल्ली वृत्तीमुळेच बेंगळुरू संघाला आयपीएल स्पर्धेचे एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही, असेही त्यांनी सांगितले.
जेनिंग्ज हे बेंगळुरू संघाचे प्रशिक्षक म्हणून 2009 ते 2014 सालापर्यंत काम पाहात होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संघाने 2009 व 2011 साली अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. मात्र, त्यांना विजेतेपद पटकावण्यात अपयश आले.
प्रत्येक सामन्यासाठी माझी काही योजना असायची मात्र, कोहलीला ती कधी पटलीच नाही. संघात निवडलेल्या सर्व खेळाडूंना रोटेशन पद्धतीने खेळवण्याचा सल्ला मी अनेकदा दिला. मात्र, त्यावर कोहलीने एकदाही गांभीर्य दाखवले नाही म्हणूनच अद्याप संघाला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही, असेही ते म्हणाले.