दुबई – आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यात महत्त्वपूर्ण सामना रंगणार आहे. यंदाच्या स्पर्धेतही कर्णधार विराट कोहलीच्या बेंगळुरू संघाला मुंबई विरुद्धच्या लढतीत प्रतिष्ठा उंचावण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघावर विजय मिळवल्यावर थाटात सुरुवात केलेल्या बेंगळुरूला पुढील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून हार पत्करावी लागली. या दोन्ही सामन्यात कर्णधार कोहली साफ अपयशी ठरला. त्याने पहिल्या सामन्यात 14 तर त्यानंतरच्या सामन्यात केवळ 1 धाव केली. त्याच्यासह एबी डिविलियर्स या दिग्गज फलंदाजालाही अपयश आल्याने त्यांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या स्पर्धेच्या 2008 सालच्या पहिल्या मोसमानंतर आजवर बेंगळुरूला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. संघात कोहली, डिविलियर्स यांच्यासह जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू असूनही त्यांच्या संघाला सातत्याने अपयशाचाच सामना करावा लागला आहे. निदान आता मुंबईविरुद्धच्या सामन्यात सरस कामगिरी करत प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.
दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ सातत्याने सरस कामगिरी करत आहे. चेन्नईकडून सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरीही त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत आपल्या चुका दुरुस्त करण्यात यश मिळवले. दोन्ही संघांची तुलना केली तर कागदावर ते एकमेकांसाठी तुल्यबळ वाटत असले तरीही कोहलीचा संघ कागदी वाघ ठरत आहे. तर, रोहितचा संघ प्रगती करत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 4 वेळा मुंबईने विजेतेपद मिळवले आहे तर, बेंगळुरूला एकदाही यश मिळालेले नाही.
यंदाही त्यांचा संघ कागदावर सरस वाटत असला तरीही त्यांच्या खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेची साक्ष मैदानात देण्यात यश आलेले नाही. दोन्ही संघांची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण समसमान आहे. मात्र, ज्या प्रकारचे नेतृत्व रोहितने सिद्ध केले आहे ते कोहलीला करता आलेले नाही. त्यामुळेच ही लढत केवळ मैदानावरची न राहता माइंड गेम म्हणून होणार आहे.
रोहितचीच कामगिरी निर्णायक ठरेल
आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा रोहित शर्मा हाच दोन्ही संघातील महत्त्वाचा फरक ठरणार आहे. त्याच्या संघात सूर्यकुमार यादव, कॅरन पोलार्ड, हार्दिक पंड्या व सौरभ तिवारी असे सरस फलंदाज असले तरी जर रोहितची फलंदाजी बहरली तर त्याला रोखणे कोहलीच्या संघाच्या आवाक्याबाहेर ठरेल. त्यामुळे तो यशस्वी ठरला तरच मुंबई हीट होणार आहे.