आबुधाबी – आयपीएल स्पर्धेत आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदाराबाद यांच्यात महत्त्वपूर्ण लढत होत आहे. या स्पर्धेत सलग तीन विजयांची नोंद करण्याची दिल्लीला संधी आहे. तर, दोन पराभव मागे टाकून सरस खेळ करण्याचे हैदराबादसमोर आव्हान आहे.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दिल्लीने किंग्ज इलेव्हन पंजाबचा तर, दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले असून हैदराबादवर विजय मिळवत सलग तिसरा विजय मिळविण्यासाठी त्यांचा संघ सज्ज झाला आहे. त्यांचे फलंदाज व गोलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करत असून पृथ्वी शॉ, शिखर धवन, शेल्डन हेटमायर, ऋषभ पंत, मार्कस स्टोनिस व कर्णधार श्रेयस अय्यर भरात असल्याने त्यांना धावसंख्येची चिंता नाही.
तसेच गोलंदाजीतही स्टोनिस, कागिसो रबाडा, अक्सर पटेल यांनी अचूक गोलंदाजी केली आहे. त्यांच्या गोलंदाजीवर अद्याप कोणत्याही संघाला वेगाने धावा जमवता आलेल्या नाहीत. कर्णधार अय्यरने केलेले गोलंदाजीतील बदल सामन्याचा एकहाती निकाल लावण्यात मोलाचे ठरले आहेत.
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासूनच दिल्लीला स्टोनिसच्या फलंदाजीने दिलासा मिळाला आहे. पंत, अय्यर यांना जरी मोठी धावसंख्या करण्यात यश आले नसले तरीही त्यांनी संघाला बळकटी मिळवून दिली आहे. चेन्नईसारख्या बलाढ्य संघालाही त्यांनी धूळ चारताना यंदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचे एक दावेदार अशी नवी ओळख निर्माण केली आहे.
दुसरीकडे मधल्या फळीतील फलंदाजांना येत असलेले अपयश हैदराबादची डोकेदुखी ठरत आहे. विजय शंकर, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, वृद्धिमान साहा, रशिद खान यांना फलंदाजीत आलेले अपयशच त्यांच्या संघाला मारक ठरत आहे. सलामीला कर्णधार डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो यांचा अपवाद वगळता त्यांच्या फलंदाजीत अनुभवाची कमतरता स्पष्ट दिसून येत आहे.
केवळ फलंदाजीतच नाही तर, गोलंदाजीतही त्यांना कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. भुवनेश्वर कुमार व संदीप शर्मा यांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही गोलंदाजाला दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. प्रमुख गोलंदाज मिशेल मार्शने दुखापतीमुळे जायबंदी झाल्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांची गोलंदाजी दुबळी बनली आहे. शंकर व अभिषेक यांना फलंदाजीसह गोलंदाजीतही अपयश येत आहे. त्यामुळे आता या सामन्यात वॉर्नर श्रीवत्स गोस्वामी व सिद्धार्थ कौल यांना संधी देणार का. हे महत्त्वाचे ठरेल.
रहाणे व अश्विनबाबत संभ्रम कायम
पंजाबविरुद्धच्या सामन्यात फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने केवळ 1 षटक टाकले व त्यात 2 गडी बाद केले. मात्र, त्यावेळी त्याला दुखापत झाली व मैदान सोडावे लागले. त्यानंतरच्या सामन्याला तो मुकला होता. आता या सामन्यात तो पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतणार का हा प्रश्न आहे. तसेच मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे यालाही या सामन्यात संधी मिळणार का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे.