दुबई – सचिन तेंडुलकर भारतीय संघात होता तोपर्यंत अनेक संघांना दडपण येत असे. आता विराट कोहली व एबी डीविलियर्स संघात आहेत म्हटल्यावर आयपीएल स्पर्धेतील अनेक संघांनाही दडपण येत आहे. त्यातच किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानेही एक गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोहली व डीविलियर्सवर बंदी घाला, अशी गंमतीशीर मागणी राहुलने केली आहे. एखाद्या खेळाडूने एक ठरावीक उंची गाठली की, त्याला थांबायला सांगितले गेले पाहिजे. कोहली व डीविलियर्स यांनी आयपीएल स्पर्धेत 5 हजारपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत, त्यामुळे त्यांना आता थांबा असे सांगितले जावे.
देशातील नवोदित खेळाडू तुमचे काम पुढे घेऊन जातील, असेही त्यांना सांगण्यात यावे, असेही मत राहुलने एका चॅट शो मध्ये सुरू असलेल्या चर्चेत व्यक्त केले आहे.
हे दोन खेळाडू संघात असले की, त्यांना कसे रोखायचे हाच मोठा प्रश्न प्रत्येक संघासमोर असतो. खरे सांगायचे तर त्यांना रोखणे कोणालाही शक्य नाही. त्यांनीच स्वतः चूक केली तरच गोलंदाजांना दिलासा मिळतो, त्यामुळे आयोजकांनी त्यांच्यावर पुढील वर्षापर्यंत बंदी घालावी, असेही राहुल थट्टेने म्हणाला. त्याच्या या मतावर सोशल मीडियावर चर्चा मात्र तुफान रंगली.