चेन्नई – आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचे साखळी सामने पार पडले असून आता आज चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स यांच्या क्लालिफायर ए सामना आज रंगणार आहे. एकीकडे महेंद्रसिंह धोनीच्या संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होणार आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाला शुभमन गिल भरात असल्यामुळे सामन्यात त्यांचेच पारडे जड राहणार असल्याचा विश्वास आहे.
यंदाच्या स्पर्धेत साखळीतील 14 पैकी 10 सामने जिंकत गुजरातने संपूर्ण वर्चस्व राखत 20 गुणांसह थाटात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. तर चेन्नईने 4 पैकी 8 सामने जिंकले तसेच एका सामन्यात निकाल न लागल्याने एक गुण मिळाला असे 17 गुण मिळवत प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. आता या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामना खेळणार असून पराभूत होणारा संघ क्लालिफायर 1 सामना खेळणार आहे. गुजरातचे पारडे जड राहणार असे दिसत असले तरीही धोनीच्या संघाने स्पर्धेचे चारवेळा विजेतेपद मिळवले आहे.
तसेच त्याच्या नेतृत्वाबात सध्यातरी अन्य कोणता पर्याय नसल्याने गुजरातची फलंदाजी रोखली गेली तर चेन्नईसाठी ही लढत सोपी ठरेल. त्याचवेळी चेन्नईला सध्या मधल्या फळीतील फलंदाजांना येत असलेले अपयश चांगलेच सतावत आहे. गुजरातने सलग दुसऱ्या वर्षी क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी त्यांचा संघ स्पर्धेत पदार्पण करत होता तरीही त्यांनी विजेतेपद पटकावले. आता यंदा धोनी पाचवे विजेतेपद साकार करण्यासाठी सज्ज बनला असला तरीही त्याला पंड्याच्या गुजरातचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे.
विजेत्या संघाला तब्बल 20 कोटींचे बक्षीस
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात विजेता संघ तब्बल 20 कोटी रुपयांचा मानकरी ठरणार आहे. 2008 साली झालेल्या पहिल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला 4 कोटी 80 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले होते. त्यात आता जवळपास पाच पट वाढ करण्यात आली आहे. जगभरात सुरु असलेल्या सर्व टी-20 लीगमध्ये आयपीएल स्पर्धेची बक्षिस रक्कम सर्वात जास्त आहे. उपविजेत्या संघाला 13 कोटी तर प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेल्या संघांना प्रत्येकी 7 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
खेळपट्टी व वातावरण
पावसाचा अंदाज असला तरीही प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी पाऊस पडणार नसल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. मात्र, दक्षिण भारतात बंगळुरुसह अन्य काही भागात पडत असलेल्या पावसामुळे येथील वातावरणही दमट राहणार आहे. खेळपट्टी आच्छादीत असल्याने सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना व नंतर फिरकीला अनुकुल राहील. तसेच दुसऱ्या सत्रात खेळपट्टीवर चेंडू सहजतेने बॅटवर येणार असून फलंदाजी करणे सोपे होणार आहे. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा कर्णधार पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.
लक्षवेधी
गुजरातसाठी यश दयाळ कमकुवत दुवा
मोहित शर्माच्या जागी शिवम मावीला संधी
तुषार देशपांडेच्या कामगिरीवरही लक्ष
अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर लक्ष
घरच्या मैदानावर नकोशी कामगिरी पुसण्याची चेन्नईला संधी