मुंबई – संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. राजस्थानचा संघ दिल्लीसमोर अत्यंत कमकुवत दिसत असल्याने आज होणारा सामना एकतर्फी होण्याचीच शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सॅमसनकडे संघाचे नेतृत्व यंदा सोपवण्यात आले असले तरीही संघात दिल्लीसारखे तुल्यबळ खेळाडूच नाहीत. त्यात स्वतः सॅमसन, जोस बटलर, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मिलर असा फलंदाजीचा भक्कम ताफा असला तरीही त्यांच्याकडे सातत्य नसल्याने दिल्लीचे काम सोपे होणार आहे.
त्यांच्या संघात यंदाच्या स्पर्धेतील सर्वात महागडा गोलंदाज ख्रिस मॉरिस असला तरीही त्याची गोलंदाजी दिल्लीच्या बलाढ्य फलंदाजीला कशी रोखणार हाच प्रश्न आहे. राहुल तेवतियासारखे अष्टपैलू खेळाडू संघात असले तरीही त्यांना दिल्ली संघाच्या तोडीस तोड कामगिरी करता येणार का याची शाश्वती देता येत नाही. या उलट दिल्ली संघ चांगलाच भरात आहे.
त्यांच्याकडे शिखऱ धवन व पृथ्वी शॉ अशी आक्रमक सलामीची जोडी आहे. त्यांनी यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यातही हे दोघे चांगलेच भरात असल्याने त्यांना पहिल्या सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये जखडून ठेवण्याचे अशक्य कोटीतील कार्य राजस्थानच्या गोलंदाजांना करावे लागणार आहे.
ऍण्ड्रयू टाय व मुस्तफिजूर रेहमान ही गोलंदाजीची जोडी वेगवान असली तरीही त्यांनी यंदा फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही.